
गुरू ठाकूर:
आता दोन दिवसांपूर्वी एक प्रसंग झालाय. माझी ””असे जगावे”” म्हणून एक कविता आहे. एका सोशल नेट्वर्किंग साईट वर, एका मुलीने लिहिले आहे की तिची एक मैत्रीण डिप्रेशनमधे गेली होती आणि सगळ्यांना भीती होती की ती आत्महत्या करणार की काय. पण ही कविता तिच्या वाचनात आली आणि खूप फरक पडला तिच्यात आणि ती डिप्रेशन मधून बाहेर आली. हे वाचून मला खूप आनंद झाला आणि असे अनुभव वाचून मला वाचकांसाठी काहीतरी चांगलं लिहायची प्रेरणा मिळते,
मी माझ्या स्ट्रगलच्या काळात लिहिली होती ती कविता. मुळात मी भयंकर positive आहे . आयुष्य किती दु:खी आहे आणि मी कसा हालात आहे हेच का लिहायचं. माझ्याकडे पैसे नसायचे, स्ट्रगल चालू असायचा, कामं नसायची. तेव्हाही चेह-यावरचा ऊत्साह कायम तसाच असयचा बरेचदा विचारल जायचं की ””तू इतका स्ट्रगल करूनसुद्धा इतका आनंदी राहूच कसा शकतोस?””
उत्तर म्हणून तेव्हा मी चार ओळी लिहिल्या होत्या:
खिशास भोके सत्त्याहत्तर
तरी चेहरा हसरा आहे
माझ्यासाठी जगणे उत्सव
रोज दिवाळी दसरा आहे…
तेव्हा ह्या ओळी जणू माझी आयडेन्टिटी झाल्या होत्या. तसं पहायला गेलं तर ही माझी पहिलीच कविता असं आपण म्हणू शकतो.
!
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती
अंबर कवेत घेताना
हसू असावे ओठावरती
काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करून जावे बरेच काही
दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या
निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
-- गुरु ठाकूर
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.